"पालवी ”

माझा ब्लॉग, माझे विचार!

मे महिना…. विचारांचा वणवा………

मे महिना…. विचारांचा वणवा………

 

 

मे महिन्याची सर्वच जण वाट बघत असतात….विश्रांती विश्रांती आणि विश्रांती!

सगळे कसे निवांत…कुणाला शाळा कॉलेजला जायची, कोर्टात जायची गडबड नाही, स्वयंपाकाला ही ब-याचदा दांडी मारता येते…कारण काही तरी बाहेरचे प्लॅन ठरतात अचानक….बाहेर ऊन मी म्हणत होते  ….म्हणुन सगळावेळ फ़ॅमिली समवेत सध्या घरातच…

रोज नवीन नवीन नवीन पदार्थांची फ़र्माइशी ह्यांनी आणि मुलाने करावी आणि ती मी पूर्ण करणे..एवढेच नाही तर कधी आम्ही दोघे मुलाला किंवा मी आणि मुलाने ह्यांना अशा त-हेने आमच्या कडे प्रत्येकाच्या हातचे काही तरी वेगवेगळे बनवले जाते….म्हणुन मजा येते…सकाळी आमरसावर ताव मारणे चालुच आहे….बाहेर वैशाख वणवा…तर घरात हिंदोळा…एकमेकांच्या सहवासात टाइमपास करणे …..पूर्ण वर्षाचा कॅटलॉग भरुन काढणे होते या महिन्यात……

 

सध्या आयपीएलचे वारे वहात असल्याने आमचा रिमोटवरचा कंट्रोल सुटला हे सूद्न्यास सांगणे न लगे ! मधल्यावेळेत मग काही तरी बघायला मिळते ही गोष्ट वेगळी म्हणा!

आज काल टीव्ही वरील ’सिरियल्स’ ना “सिरियल किलर” का संबोधु नये असे मनात येवुन गेले…सध्या घरोघरी य़ा सिरियलसचा धुमाकूळ घातला जातोय…जणु काही टीव्ही सिरियल्सचा वणवा पेटला आहे…..एक तरी धड आहे का? अर्थात नियमाला अपवाद असू शकतो म्हणा ! म्हणजे माझ्या कडे तरी अपवाद नाही …तुमच्या कडे असेल तर जरुर सांगा….

सध्या क्रिमिनल सिरियल्सचा टीआरपी चांगला आहे असे कळल्याने प्रत्येक चॅनल्सवाले आता क्रिमिनल सिरियल्स काढत सुटलेत….मला तर सुरुवातीला तेच बरे वाटु लागल्याने दुसरे काही बघुच वाटेना….मग त्याची सत्यता आणि तथ्य विचारात घेता म्हणले की बस्स ! आता खुप झाले!..नाही तर आपण आपली सदसद विवेकबुद्धी कदाचित अशाने गहाण टाकु की काय!

महादेव मालिका छान वाटली म्हणुन बघत होते….तर त्यात जुळे महादेव टपकले आणि ती बंद केली बघायची. तशीच अवस्था झाशीच्या राणीची झाली होती..यांना डबलरोल आणुन काय दर्शवायचे असते कुणास ठावुक?.मराठी तर “तु तिथे मी” ,” पुढचं पाऊल”, सारख्या मालिका तर कहरच आहे…..”राधा” तर “सांगा मी कुणाची? ह्याची का त्याची?” करत पिडत बसलीय….पण त्यातल्यात्यात तीच बरी आहे म्हणायचे….”मला सासू हवी” आणि “शेजारी शेजारी..पक्के शेजारी”…अरे बापरे बाप! त्याबद्द्ल तर काही बोलणेच नको. या दोन ही मालिका म्हणजे फ़ालतु पणाचा कळस आहे कळस! जे कुणी या मालिका बघत असेल त्यांची कीव करावीशी वाटते…त्याच्या रसिकपणाची पण कमाल आहे.. ”उंच माझा झोका” ही छान आहे मालिका …रमाबाई रानडे यांच्या विषयी बरीच माहिती मिळते आहे…पण आलवणीतल्या बायांवर आणि त्यांच्या पासून होणा-या त्रासावर जरा जास्तच फ़ोकस होतोय असे वाटु लागले आहे…आणि बाकीच्या रामरगाड्यात मुळ रमाबाईंचे कार्यच पुसट तर होत नाही न? असे वाटु लागले आहे….

सध्या सर्वात मस्त वाटते ते मास्टर शेफ़…..मस्त कार्यक्रम आहे….सर्वांनी बसुन बघण्यासारखा आहे…आवडला…त्याच प्रमाणे लहान मुलांचा “इंडीयाज बेस्ट ड्रामेबाज”…हा कार्यक्रम…खरतर परिक्षकांवर कार्यक्रमाचे म्हणजे टीआरपी चे यश आहे असे वाटते…योग्य परिक्षक कार्यक्रम खुलवु शकतो…..

असो! एकदंरित सध्या टीव्ही में कुछ दम नहीं! ….अशी परिस्थिती आहे…..

फ़ेसबुक, आर्कुट, ट्वीटर या सारखे मायाजाल…फ़ार माया लावु शकत नाहीत आता…

सध्या आता एक नवीन आवड जोपावीशी वाटली…अर्थात इतके वर्षात का नाही सुचले म्हणुन दोष देत होते स्वत:वर….पण हरकत नाही….वयाची ५०शी उलटली आणि मी हार्मोनियमचा क्लास जॉइन केला आहे…खुप मस्त वाटते आहे….खरच संगीत इतका आनंद देवु शकते याचे गणित आता उलगडले…संगीत शिकणे सुरु झाल्या पासुन मनातील विचारांची गती कमी होवुन स्वास्थ लाभल्याचे जाणवते आहे…मनात विचारांचा नेहमी वणवा पेटत असे….पण आता ब-या पैकी  छान वाटते आहे…

असाच हा विचारांचा वणवा थोडा विस्कळीत स्वरुपात आपल्या समोर ठेवला….वणवाच तो…एकसंध थोडाच असेल?

————————————————————————————————————

-सौ.पल्लवी उमेश कुलकर्णी…

 

 

 

 

८ मार्च –आंतरराष्ट्रीय महिला दिन……

८ मार्च –आंतरराष्ट्रीय महिला दिन……

आज २१व्या शतकात आपण महिलांनी बरीच मजल मारली आहे..आज प्रत्येक क्षेत्रात ती पाय रोवुन उभी आहे..आणि हे कौतुकास्पद आहेच..एका जर्मन महिलेला महिलांच्या कष्टाची जाणीव झाली आणि ती जगा समोर यावी या साठी तिने प्रयत्न केले…असंख्य कामगार महिलांनी तिला उत्तम साथ दिली..२०व्या शतकाच्या सुरुवाती पर्यंत जगभरातील जवळ जवळ सर्व स्त्री वर्गाला मतदानाचा हक्क नाकारलेला होता.पुरुष प्रधान संस्कृतीचे हे एक विदारक सत्य होते.या स्त्री –पुरुष विषमतेसाठी ,अन्यायाला वाचा फ़ोडण्यासाठी स्त्रिया प्रयत्नशील होवु लागल्या होत्या. या साठी १९०७ मध्ये स्टुट गार्ड येथे पहिली आंरराष्ट्रीय  समाजवादी महिला परिषद भरली होती.त्यामध्ये क्लारा झेटकिन या अतिशय तडफ़दार कम्युनिस्टवादी महिलेने “सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाचा हक्क मिळवण्यासाठी संघर्ष करणे हे समाजवादी स्त्रियांचे कर्तव्य आहे” अशी जोरदार घोषणा केली. ८मार्च १९०८ ला न्युयॉर्क मध्ये स्त्री कामगारांनी प्रचंड प्रमाणात निदर्शने केली. कामाच्या ठीकाणी सुरक्षितता आणि सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाचा हक्क या दोन प्रमुख मागण्या केल्या.या अमेरिकेतील महिलांच्या व्यापककृतीने प्रभावित होवुन क्लारा झेट्किन ने हा प्रश्न डेन्मार्क मधील कोपनहेगन या शहरात दुस-या आंतरराष्ट्रीय महिलांच्या परिषदेत मांडला …तो दिवस होता ८ मार्च १९१०…..अमेरिकन स्त्री कामगारांनी केलेल्या या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ  ८ मार्च हा दिवस म्हणुनच जागतिक महिला दिन म्हणुन साजरा होवु लागला.

यावर्षी १०२ वर्ष पूर्ण होताहेत या दिवसाला, या इतक्या वर्षाच्या कालखंडात खरच स्त्री खुप पुढे निघुन गेली आहे. आज ती प्रत्येक क्षेत्र पादाक्रांत करताना दिसते..पूर्वी चूल आणि मूल करणारी स्त्री आज त्या जबाबदा-या संभाळून देखिल आर्थिक क्षेत्रात खंबीर उभी आहे..पण पण—

खरच ती स्वतंत्र आहे? असा प्रश्न पडतोच.आज पुरुषांच्या विखारी नजरा, बालिके पासून वृद्ध्ये वर ही  अत्याचार होताना दिसतात..गर्दीत, समाजात, शाळेत, नातेवाईकांत आज एकटी स्त्री असेल तर ती खरोखरीच सुरक्षित आहे का? नोकरीच्या ठीकाणी, लोकल मध्ये, अपरात्री प्रवास करणारी स्त्री सुरक्षित आहे? …..तर नाही हेच उत्तर येइल..ही परिस्थिती  खेड्या पाड्या पासून मोठ्या शहरांपर्यंत एकच आहे.. ज्यांना घरातुन पुरुषी साथ आहे, भक्कम आधार आहे..त्या सोडल्या तर परितक्त्या, विधवा, एकाकी रहाणा-या, ज्या बालिका अनाथ आहेत अशा स्त्रियांचे स्त्रीत्व नक्कीच धोक्यात आहे.पण त्या घाबरतात म्हणुन ही असेल म्हणा..पण ही सत्य परिस्थिती आहे. ज्या या ही परिस्थितीत खंबीर ताठ मानेने उभ्या आहेत त्यांना समाज टरकून असतो….खरतर स्त्री ही जात्यात भित्री असते असे म्हणतात, तिच्या वर टीका ही केली जाते..पण स्त्री ही घाबरते ते फ़क्त पुरुषांना..हे कटु सत्य नाकारता येणार नाही..

अत्याचारी स्त्री किंवा ज्या घरी स्त्रीवर अतोनात अत्याचार घडलेले किंवा घडत असतात, आजुबाजुला स्त्री वर होणारा अन्याय बघत असतात, ते लोक नवीन स्त्रीजन्माला म्हणजे मुलीला जन्म द्यायला घाबरु लागलेत..त्यात लग्न हा व्यापार बनू लागला आहे, महागाई प्रचंड , खाणारी तोंडे घरात अनेक …अशाने मुलगी जन्माला आली तर तिचे संगोपन, मोठी होइ तो पर्यंत डोळ्यात तेल घालुन संभाळणे, लग्न कार्य आणि समाजाच्या वाईट नजरा या पासून सुटका केली तर बरे! या कारणाने तर आज मुलीच्या जन्मावरच प्रश्न चिन्ह उमटले नसेल ना? म्हणुन तर स्त्री भ्रूणहत्या घडत नसतील ना? हा प्रश्न मनात आल्या वाचुन रहात नाही.

८ मार्च हा दिवस सगळीकडे जोरदार साजरा होताना दिसतो..वेगवेगळ्या स्पर्धा , फ़ॅशन शो, यावर अतोनात खर्च होताना दिसतो..त्या पेक्षा स्त्रीवर होणारे अत्याचार, बालिकेपासून मोठ्या मुलींना कसे संभाळावे, त्यांची सुरक्षितता.. अन्यायावर तोडगा….विवाहानंतरचे समुपदेशन, घटस्फ़ोटा पासून  संसार वाचवणे —घराघरात भांडणे –तंटे होवु नयेत, स्त्री स्त्रिची खरी मैत्रीण आहे..शत्रू नव्हे….अशा अनेक विषयावर प्रबोधने चर्चीली जावीत असे मला वाटते..

आज आपण मध्यमवयीन स्त्रिया महिला दिन आला कि बाहेरचे प्लॅन आखतो …दिवसभर बाहेर रमतो पण मोलकरणीच्या जीवावर!…..त्या ही महिला आहेत हे आपण का लक्षात घेत नाही…का त्यांना एक दिवस आपण सुट्टी बहाल  करत या दिवशी?

असो! अनेक बाजु आहेत महिला दिनाच्या साज-या करणावरुन…महिलांपुढे अनेक आव्हाने आहेत , पण सर्वात जास्त आहे ते म्हणजे तिची सुरक्षितता तिचे आरोग्य ..आणि घरगुती हक्क!

आज बाहेरच्या समाजातुन तिला अनेक हक्क मिळालेले आहेत…नव्हे ते तिने मिळवले आहे ..

पण आज घरात बहुतेक ठीकाणी पुरुष सत्ताच चालते..काही महत्वाचे निर्णय घेताना गृहलक्ष्मीचे मत विचारात घेतले जात नाही..तिला फ़क्त निर्णय ऐकवले जातात ..तर असे न होवु देता..तिला योग्य तो सन्मान मिळणे आवश्यक आहे.आरोग्याची काळजी तिने स्वत:च घेतली पाहिजे..त्यासाठी स्वत;साठी रोज काही तास बाजुला ठेवुन  योग, फ़िरणे,किंवा स्वत:च्या छांदात तिने रमवुन घेतले तर ती जास्त आरोग्य प्राप्त करु शकेल.

“निरोगी, हसतमुख आणि शांत स्त्री घराचे वैभव असते.”…………

अशी नवी म्हण करायला हरकत नाही.

———————————————————————————————————————————————————————-

सौ.पल्लवी उमेश कुलकर्णी

जयसिंगपूर.(जिल्हा कोल्हापूर)

 

एक पत्र ….

प्रति,

मा.(?)नगरसेवक,

आपणास माझा नमस्कार..

खरतर आपली एकदाच गाठ पडली होती..मला वाटते तो निवडणुकीचा काळ होता.एकदा आपण निवडुन आलात आणि आम्हाला विसरलातच जणु….किती वेळा आपणाशी मी संपर्क करण्याचा प्रयत्न केला…पण व्यर्थ..आज पत्र लिहुन तुमच्याशी संवाद साधण्याचा विचार आला…आता खरतर पत्र लेखन ही मागे पडले आहे.एक नंबर फ़िरवला की लगेच जिथे प्रत्यक्ष व्यक्तीशी बोलता येते तेथे पत्राचे काय काम…पण खर सांगु का…आज जेवढे नवीन नवीन संवादाची सुविधा उपलब्ध आहे तेवढेच त्याची किंमत कमी कमी होत आहे असे वाटते आहे..कारण कुणा एका बिन कामाचा फ़ोन म्हणुन हो हो म्हणुन तुम्ही तो टाळता हे न कळण्या इतपत आम्ही बुद्धु नक्कीच नाही.

असो..आज पत्र लिहीण्याचा हेतु म्हणजे…आज आपले गाव किती बेशिस्त होवु लागले आहे..त्याला “नगर” म्हणायची ही लाज वाटते आहे..जेवढ्या सुविधा म्हणुन आपण जाहिर करता तेवढ्या त्या प्रत्यक्षात आहेत का ? ठीकठीकाणी घाणीचे साम्राज्य, उकिरडे ओथंबुन वाहाताहेत….फ़ुटपाथ हे नागरीकांच्या चालण्यासाठी केले आहेत की दुकानदारांच्या गाड्या लावण्यासाठी हा प्रश्न पडतो…नव्हे फ़ुट्पाथ शोधावे लागताहेत….चौका चौकात गर्दीचा उच्चांक मोडला जात असून ही प्रशासन जागे होत नाहीत. रस्त्यावर वाहातुकीचे नियम कुणी ही पाळत नाही, मग परत तोच तोच कर्कश आवाजाचे ध्वनी प्रदुषण…आज आपल्या या मुख्य रस्त्यावर अपघाताने किती बळी गेले आहेत त्याची एकदा उजळणी करावी आपन ही नम्र विनंती..आपल्या या मुख्य रस्त्याचे विस्तारिकरण करण्याची आणि ओव्हरब्रीज करण्यास आपण करत असलेला विरोध हा नक्की कशासाठी आहे? त्यात काही आपले स्वार्थ लपले आहेत का?… “जनतेचे हित,तेच आपले ध्येय” …हे ब्रीद असावे…

आपली लायब्ररी ही किती वर्षे जुनी आहे…पण ती निटनेटकी नाही…तिथे शिस्त,नीटनिटकेपणा चा अभाव आहे.जिना अतिशय अस्वच्छ असतो.

तसेच आपल्या गावात जे सार्वजनीक पुरुष स्वच्छता(अस्वच्छता) गृह आहेत…ते भर वस्तीत रत्यावर आहेत..तेथुन जाताना स्त्रीवर्गाला लज्जा उत्पन्न होते आहे…आणि दुर्गंधी मुळे नाक दाबुन पुढे जावे लागते…तरी आपण ते दुसरीकडे हलवुन, भर वस्तीतुन काढुन टाकावे…

आपल्या नगरीचा विकास हा आपणापासूनच सुरु केला तर हळूहळू स्वप्ननगरी बनेल आपले जयसिंगपूर..खरतर आपण आपल्या भागातुन आमचे प्रश्न ऐकुन घ्यायला निदान एकदा तरी आपला मुखचंद्र दाखवावा…आपण कुणाला निवडुन दिले हे कालांतराने आम्ही ही विसरु लागलो आहे त्यामुळे..पाणीप्रश्न हळूहळू बिकट रुप धारण करु लागलेला असताना काही नळांना चाव्या नाहीत अजुन ही…तर काही नळ तसेच वहात असतात …दिवसा ब-याचदा रस्त्यावरचे लाईट चालूच असतात…मग भार नियमन करुन नाहक जनतेला वेठीस धरता…भारनियमन जरुर करावे पण त्याला ही काही नियम असले की आधी मनाची तयारी होते..व नाहक त्रास सोसावा लागणार नाही.

असो..हे गा-हाणे मी पुरे करते…पण एवढेच सांगते की आपल्या पासून सुरुवात केलीत आपले गाव स्वच्छ करण्यास तर आम्ही आपल्या बरोबर आहोत…अशानेच आपल्या नगरीचा, पर्यायाने राष्ट्राचा, देशाचा विकास होईल..काही कामे करावीत आपण म्हणुन आम्ही आपणास निवडुन दिले आहे, याचा कृपया आपणास विसर पडु नये म्हणुन हे पत्र.

नुसते फ़ोटो सेशन पुरते काम न करता विकास कामास प्रत्यक्ष फ़क्त सुरुवात करायला हवी…हे नक्की..

आपणास काही कमी जास्त बोलले असेल तर क्षमा असावी.पण  तो नागरीक म्हणुन माझा हक्कच आहे..

कळावे,

आपली विश्वासू,

सौ.पल्लवी उमेश कुलकर्णी

२१.२.२०१३

दुष्काळाची दस्तक………..

दुष्काळाची दस्तक………bhopal_farmer_draught_030527

images..
सध्या महागाईने कळस गाठला आहे. दुष्काळ उंबरठ्यावर उभा आहे. महाराष्ट्रात ब-याच ठीकाणी दुष्काळाचा सामना आपले सहकारी करत आहेत..त्यात वीज संकट ही समोर आssssवासून उभे आहे…गॅस, पेट्रोल, पाणी ,अन्नधान्य, भाजी पाला, दूध, यांनी कळस गाठला आहे…अजुन उन्हाळ्याला सुरुवात नाही.पूर्ण मार्च,एप्रिल आणि मे महिना पार पडायचा आहे आणि पाणी प्रश्न यक्ष प्रश्न म्हणुन भेडसावत आहे…
या संकटांची यादी वाढतच चालली आहे…ती गंभीर वळणावर उभी असताना आपण आपले सण समारंभ , लग्न कार्य अगदी साधे पणाने साजरे नाही का करु शकत..त्याच प्रमाणे आता ८ मार्चला महिला दिन आहे,…शिवजयंती आहे,….शाहूजयंती ही काही कारणाने(आचार संहीतेमुळे लांबणीवर पडलेला आहे) नंतर साजरी होइल..व्हॅलेन्टाइन डे….असे सार्वजनिक कार्यक्रम यावेळी पूर्ण बंद ठेवुन, जो काही पैसा वाचेल तो दुष्काळ ग्रस्तांसाठी मदतीचा हात म्हणुन पुढे करायला हरकत नाही…नाहीतर तो खर्च काही विधायक कार्यासाठी वापरता येतो का याचा एकत्रित येवुन विचार व्हावा..जेणे करुन काही घरात अंधार आणि आपण मात्र उत्सवात …..हे बरे नाही.
महिला महोत्सवला तर यावर्षी पूर्ण फ़ाटा देवुन स्त्री भ्रूण हत्या रोखणे, स्त्री अत्याचार झालेल्या भगिनींना मदत करणे, गरीब स्त्रियां ..मजुर स्त्रियांना त्या एक दिवसाचा पगार फ़ुकट द्यावा…नुसती व्याख्याने देवुन काहीही साध्य होत नाही…दिवसभर नटुन थटुन, नाच गाणी करणे, बघणे आणि ऐकणे यातुन क्षणभराचे मनोरंजन होते, कलागुणांना वाव मिळतो…पण याची ह्या घडीला काहीही आवश्यकता नाही हे खरे. तसेच व्याख्यानांना फ़क्त पांढरपेशीच स्त्रिया उपस्थित असतात. त्यापेक्षा स्त्रियांचे खरे प्रश्न काय आहेत याचा लेखाजोखा घेतला जावा. स्त्रियांचे सत्कार करण्यापेक्षा गरिब स्त्रियांना, मजुरांना प्रत्यक्ष पैशाची, अन्नधान्याची मदत केली पाहीजे….
दुष्काळाच्या या पार्श्वभूमीवर आता सर्वांनी अशा साज-या होणा-या सार्वजनिक कार्यक्रमाला कडाडुन विरोधच करायला हवा.
आणि वैयक्तिक स्तरावर ज्या त्या व्यक्तींनी समजुन उमजुन आपल्या परिने योग्य दिशेने पाऊले उचलावीत ही कळकळीची विनंती…

———————————————————————————————————————–
सौ.पल्लवी उमेश कुलकर्णी,
जयसिंगपूर

(आजचा दैनिक सकाळ दिनांक १५/२/२०१३ला हे पत्र प्रसिद्ध झाले आहे)

महालक्ष्मीच्या दरबारातील घोटाळे…

महालक्ष्मीच्या दरबारातील घोटाळे…
गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूरच्या महालक्ष्मी देवळातील काही अक्षेपार्ह्य घटना आपल्याला वाचायला मिळत आहेत..पण या सामान्य जनतेला नवीन नाहीत..या आधी ही या घटांनाचा पर्दाफ़ार्श झालेलाच होता.पण काळानुरुप आपण त्या विसरुन जातो आणि मग परत या लोकांचे फ़ावते आणि परत “ये रे माझ्या मागल्या” म्हणत परत त्याच त्याच गोष्टी घडताना दिसतात.
खरतर आता लोकांनी जागृत होण्याची वेळ आली आहे..एकतर देवी किंवा कोणता ही देव हा तुम्ही दिलेल्या वस्तुंचा भुकेला नसतो..तो पूर्ण संपंन्न असतो…त्याला काहीही नको असते, तर तोच तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी तिथे उभा असतो..फ़क्त आपण तिथे हात जोडुन फ़क्त नमस्कार केला तरी त्याला पुरते…त्याला एक साडी –खण, नारळ याची आशा नसते..तो भाव-भक्तीचा भुकेला असतो..आपण दिलेली साडी देवीला नुसती दाखवुन बाजुला फ़ेकली (अक्षरश: फ़ेकली ) जाते..नवरात्रात तर ज्या गुरुंजीचा वार वाटुन दिलेला असतो ,त्याचे घर साड्यांनी भरले जाते…मग कमी किंमतीत त्या साड्या ठरलेले गि-हाईक खरेदी करत असतात….(कारण त्याचे मग करायचे काय? हा यक्ष प्रश्न त्यांच्या समोर असतो) दिवशी आपल्याला जर काही करायचीच इच्छा असेल, तर आपण दानपेटीत पैसे टाकावेत. जेणे करुन मंदीर स्वच्छता, अन्नदान किंवा अन्य काही विधायक कार्यासाठी आपला पैसा वापरला जातो.कारण आपण ज्यात पैसे टाकतो ती पेटी ट्रस्ट्ची असते…त्यामुळे त्याचा योग्य तो वापर होतो. साडीच द्यायची इच्छा असेल तर देवीच्या दारात किंवा ज्यांना खरोखरीच कपड्यांची गरज आहे अशा गरजु स्त्रीला साडी नेसवा.बघा महालक्ष्मीला नेसवण्याचा आनंद आपल्याला मिळतो कि नाही ते!
आज देवाच्या दारात फ़ुले,हार, पैसे, नारळ ,खण, साडी , ईश्वराला अर्पित केले जाणारे दागिने या गोष्टींना फ़ाटा देवुन तेवढाच खर्च एका गरजु कुटुंबाला करावा…असे केल्याने देवळाच्या दारात जो खच पडतो, तो परत विकायला बाहेर न जाता ,भाविकांच्या श्रद्धेला ही धक्का पोहचणार नाही..व भाविकांचा पैसा ही योग्य कारणी लागेल.मानसपूजेद्वारे आपण आपल्या इष्ट्देवतेला हवा तो साज श्रृंगार चढवु शकतो…असे केले तर देवळातील गर्दी ही कमी होइल आणि असे घोटाळे ही बंद होतील.
————————————————————————————————————————————————————————– सौ.पल्लवी उमेश कुलकर्णी
जयसिंगपूर…

(दैनिक सकाळ —-शुक्रवार ८ फ़ेब्रु.२०१३ ला पत्ररुपाने प्रसिद्ध झाले आहे.)

Post Navigation

Follow

Get every new post delivered to your Inbox.

Join 198 other followers

%d bloggers like this: