Posted in लेख, स्वरचित...

नवरात्र…सहावी माळ.

(६)
सहावी माळ……..
नवरात्र दुसरे वर्ष….
मला भावलेलं स्त्रीत्व🙏
नवदुर्गाच्या नऊ स्तोत्रांसहित…🙏

नवदुर्गा मंत्र
प्रथमं शैलपुत्री च द्वितीयं ब्रह्मचारिणी
तृतीयं चन्द्रघंटेति कूष्माण्डेति चतुर्थकम्,
पंचमं स्क्न्दमातेति षष्ठं कात्यायनीति च
सप्तमं कालरात्रीति महागौरीति चाष्टमम्,
नवमं सिद्धिदात्री च नवदुर्गाः प्रकीर्तिताः।

सहावी देवी कात्यायनी नमस्कार असो🙏🙏
चन्द्रहासोज्ज्वलकरा शार्दूलवरवाहना।
कात्यायनी शुभं दद्यादेवि दानवघातिनी॥६॥

अर्थ…
चंद्रहास, शार्दुल, सिंहावर स्वार होऊन राक्षसांचा संहार करणारी तेजस्वी माता कात्यायनी आपल्या सर्वांसाठी शुभ होवो.

काल मी देवीची ओटी भरायला म्हणून येथील एका देवीच्या देवळात गेले होते….ओटी भरून तिथेच एका जागी बसून श्रीसुक्त म्हणत थोडावेळ बसले होते.
आजूबाजूला गर्दी होती, मुले खेळत होती,पळत होती. तर त्या मुलांमध्ये एक जुळ्या मुलींची जोडीने माझे लक्ष वेधून घेतले. सेम टू सेम…खूप गोड होत्या त्या…तिथेच बसलेल्या त्यांच्या आईशी मी बोलत होते…मी म्हणले,
‘ कसे ओळखता तुम्ही किंवा घरचे त्यांना काय माहीत बाई…’
ती हसली फक्त…नावे पण गोड होती त्यांची. केतकी आणि प्राजक्ता.
ती म्हणाली, ”नीट बघा! दोघींच्या रंगात किंचित फरक आहे…एक जरा सावळी आणि दुसरी गोरी… सावळी म्हणून ती केतकी…आणि गोरी म्हणून ही प्राजक्ता….अहो! घरी तर काळी गोरी म्हणून चिडवत हसत असतात सगळे.”..इती ती आई!

मला आत्ता पर्यंत कळलेच नव्हते, माझं लक्षच रंगाकडे नव्हते,तर त्यांच्या निरागस हसण्या खिदळण्याकडे होते……नीट बघितल्यावर लक्षात आले. मला धक्काच बसला. पण रंगावरून नावे ठेवली हे ऐकून आश्चर्य वाटले. केतकी म्हणून काळा म्हणे! ..हे कुठले लॉजिक ? काय परिणाम होईल केतकी वर….पुढे मोठी होईल तशी.. घरातूनच असे ऐकायला आले तिला, तर उद्या बाहेरचे पण म्हणू शकतील न ! बाळ मनावर एकदा ओरखडा उठला, तर तो कायमचा व्रण राहतो. खरचं आज ही घरातून काळी गोरी म्हणून म्हणत असतील? मला विश्वासच बसत नाही अजून ही. त्या बाईला समजावून पण सांगितले, की असे बोलणे बंद करा म्हणून.पण न ओळखीची न पाळखीची. ….क्षणभराच्या भेटीतून ती माझे का बरे ऐकेल?…आणि का ऐकावे न?

पण एक गोष्ट खरी आहे…आज ही आपण 21व्या शतकात एवढी क्रांती करून, एवढे पुढे गेलो असलो, तरी ही रंगावरून तुलना ही होतीच होती. आज लग्नाच्या बाजारात ..,(हो मी बाजारच म्हणेन…कारण समाजाचे वागणेच तसे आहे.)…..गोरे पणाला खूप महत्व आहे . आता पर्यंत मुली कितीही शिकल्या किंवा न शिकल्या तरी त्या गोऱ्या असणे ही पहिली अट असते…. .. पूर्वापार पासून आज पर्यंत हे कमी झालेले नाही .आता फरक इतकाच पडला आहे, की आजकाल मुलींना ही गोराच नवरा हवा असतो….. म्हणजे काय तर व्यक्तीच्या बाह्य सौंदर्याला , दिखाव्याला आता महत्त्व जास्त मिळत आहे.एखादे लव्ह मॅरेज करून आलेल्या जोडप्याला त्याच्या पेक्षा रंग रूपाने कमी असलेली मुलगी बघून घरातील लोकच यापेक्षा कुणी चांगली मिळाली असती रे! म्हणून हिणवणारे कमी नाहीत आपल्या आजूबाजूला.

एखादी सावळी स्त्री काय कमी कर्तबगार असते का ?…की तिच्यात काहीच सद्गुण नसतात? की ती पैसे कमवायला लायक नसते, की जगायला लायक नसते? हा कुठला न्याय आहे ? आपला देश हा गोऱ्या लोकांचा देश आहे का? सर्व मुली गोऱ्या आणि देखण्या कशा असतील?… तिच्यातील अंतर्गत सौंदर्य किती तरी पटीने अधिक असते . ती उत्तम स्त्री म्हणून समाजात ताठ मानाने उभी असते, कर्तुत्ववान असते. अनेक ठिकाणी ती लीलया संस्था चालवत असते, बॉस म्हणून मिरवत असते ..बिझनेस करत असते….पण लग्नाच्या वेळी मात्र तिचा रंग आडवा येतो?….ही कुठली मानसिकता? श्रीमंतांच्या घरी किंवा उच्चभ्रू घराण्यात रंगांनी एकदम सावळ्या असणाऱ्या स्त्रिया क्वचित आढळतील. तिथे मखरात सुंदर, देखण्याच महिला दिसतील…मग अकलेने कांदा असल्या तरी….
मला हे पटतच नाही .हे कितपत योग्य आहे..मी कॉलेज मध्ये होते तेंव्हा आमच्या कॉलेज मध्ये एक मामड्याल नावाची मैत्रीण होती . ती साळी समाजापैकी होती.वर्णाने पूर्ण काळी होती.पण ती इतकी सुंदर होती की येणाऱ्या जाणाऱ्यांच्या नजरा तिच्याकडे जायच्याच.. एकतर तिचे व्यवस्थित रहाणे, वेशभूषा उत्तम साजेशी….. सर्वांशी हसतमुख, हसरी हसरी..अभ्यासात एक नंबर, मित्र मैत्रिणी अफाट. सोलापुरात सलग ३/४ वर्ष दंत स्पर्धेत प्रथम क्रमांक…
अशी व्यक्ती मग ती माणूस म्हणून उत्तमच स्त्री होती…तिचा कुठे ही रंगावरून कुणी बोलत नसे…तिच्यात काहीच कमीपण नव्हते…पण लग्नाच्या वेळी काय त्रास झाला ते माहित नाही . तर सांगायचा मुद्दा हा, की अशा असंख्य मुली ज्या स्वभावाने, कर्तुत्वाने किंवा अंतर्गत गुणधर्मात … अतंर्गत सौंदर्यात योग्य जागी असताना, त्यांचे समाजात व्यक्ती म्हणून एवढी अवहेलना का केली जाते…तिला कमी का लेखले जाते?
टिव्ही वर मध्यंतरी ‘ रंग माझा वेगळा ‘ ही मालिका येऊन गेली. म्हणजे सिरीयलवाल्यांना ही अशा काळया गोऱ्या बहिणींवर सिरीयल काढावी वाटली…. टिव्ही आणि सिनेमाचे विषय हा समाजाचाच आरसा असतो. म्हणजे हा समाजातील राजरोस वाढत असलेला प्रश्न आहे. त्यात ही काळया सावळ्या मुलीची भूमिका केलेली दीपा हे पात्र घरातील, बाहेरील सदस्यांच्या तिरस्कृत नजरेला आणि त्यांच्या वागण्याला कशी समर्थपणे तोंड देते, हेच दाखवले आहे आणि आपल्या स्वभावाने आणि हुशारीने ती या सर्वांना भारी पडत सर्वांची मने जिंकते…पण याचा त्रास हा होतोच अशा सावळ्या स्त्रीला.
आज जर नवरा बायको जोडीत कुणी एक गोरा आणि कुणी काळा असेल , तर बघणारेच म्हणतात, ” किती विजोड जोडी आहे ही ! याला/हिला यापेक्षा चांगली /चांगला मिळालं असतं स्थळ “
….अरे ! पण ती जोडी आपापसात खुष आहे, संसार उत्तम करत आहेत… मुलं बाळ आहेत…मग तुमच्या का पोटात दुखतयं…का वायफळ कमेंट करत आहात तुम्हीं..!

हे कुठे तरी थांबायला हवे. घरातूनच लहान पणापासून मुलांवर तसे संस्कार व्हायला हवेत . वर्ण भेद करणे कसे चुकीचे आहे हे सांगायला हवे मुलांना..कुणाला मागून रंग मिळत नसतो,तर तो जन्मत:च येत असतो……घरातील सदस्यच जर वर्णा वरून तिला सतत टोमणे मारतील, तर बाहेर हे घडणारच. आणि वरून कसे ही रूप असेल,तरी ती स्त्री म्हणून,एक माणूस म्हणून किती छान आहे, सुंदर आहे हे ओळखायला हवे. हो न!
आज टिव्ही वर प्रत्येक सिरीयल किंवा जाहिरातीत सहाय्य किंवा प्रमुख भूमिकेत गोरीच नटी असते. आपली बघणाऱ्याची पण तीच मागणी असते…मागणी तसा पुरवठा …म्हणजे या गोष्टीला आपणच जबाबदार नाही का बरं?
मध्यंतरी टिव्हीवर सतत Fair & Lovely ची जाहिरात येत होती..म्हणजे हे आमचे क्रीम लावा आणि पटकन गोरं व्हा…असा फंडा होता जाहिरातीचा.पण ही जाहिरात करायला कंगना राणावत, साई पल्लवी या सारख्या नट्यानीं नकार दिला.कंगना तर म्हणाली, माझी बहिण काळी आहे. जर मी ही जाहिरात केली, तर तिच्या रंगावर चेष्टा केल्यासारखे होईल.आणि साई पल्लवी तर आहे तशी स्किन कॅरी करते. समाजातील महिलांनी ही या जाहिराती विरुध्द आवाज उठवला.व आमचा रंग आम्हांस प्रिय आहे असं ठणकावून सांगितले…आणि या जाहिरादारास आपले नाव बदलून Glow & Lovely असं ठेवावे लागले. ही आहे स्त्री शक्ती…. असं कोणत ही क्रीम लावून गोरं होत नसतं कुणी….हे कळायला हवे समस्त स्त्री जातीला…वेगवेगळे क्रीम चोपडून आपल्या गालाचे मात्र भजं व्हायला वेळ लागत नाही .आणि अशा मुळे कायमचे व्रण मात्र ठिय्या मारुन बसतात गालावर तो वेगळाच विषय…..स्त्री ने एकदा मनात आणलं, तर ती काहीही बदलवू शकते ,प्रसंगी कोणतीही परिस्थिती देखील.

हे ही दिवस जातील आणि समाज बदलेल…नव्हे बदलावा लागेल, नाहीतर स्त्रियाच बदलतील. तिच्यात तेवढी ताकद निश्चितच आहे..आज चंद्रावर जाणाऱ्या आमच्या भगिनी असल्या फालतू गोष्टीत अडकून फसणाऱ्या नाहीत,आणि सहन ही करणार नाहीत या पुढे…तो जमाना आता कालानुरूप मागे पडला…जो “सहनशीलता म्हणजे स्त्री”…. हे समीकरण जाणत होता. आता स्त्री समाज घडवते आणि सांभाळते ही उत्तम….ते ही स्वकृत्वाच्या बळावर ..तिथे ती काळी की गोरी हा भेद पूर्ण विसरून कामाप्रती निष्ठा ठेवून आपली ‘स्व:’ ची ओळख निर्माण करत आहे. आणि आपल्या कामात पूर्ण कर्तव्याची जाण ठेवली की आत्मविश्वास प्राप्त होतो.आणि आत्मविश्वासानं जगणारी स्त्री आपोआप सुंदर होते. सौ.सुध्दा मूर्तींच्या मते देखील…..
प्रत्येक स्त्रीने हे लक्षात घ्यायला हवे,की पुरूषी नजरेतून स्वतःचं सौंदर्य तोलणं, म्हणजे स्वतः मधील स्त्रीत्वाचं अधःपतन करवून घेणं आहे…सौंदर्य बाहेर कशात नाही, तर मनांत आहे… आपण करत असलेलं प्रत्येक काम म्हणजे सौंदर्याचंच सादरीकरण असतं… आपल्याला आपल्या कृतीतून सौंदर्याची निर्मिती करता आली पाहीजे…
अभिमान आहे मला तिचा आणि तिच्यातील स्त्रीत्वाचा. आज ती नवदुर्गाच्या रुपात समाजात वावरत आहे . मुलगी, बहीण, बायको,आई….भूमिका निभावताना ती कधी घरात अन्न बनवणारी अन्नपूर्णा , तर प्रसंगी अन्यायाचा सामना करणारी रणचंडिका किंवा महिषासुर मर्दिनी असते …
अशा या आमच्या सर्व भगिनिंच्यातील स्त्रित्वाला माझा मानाचा मुजरा..

”या देवी सर्वभूतेषू कान्ति रूपेण संस्थिता। नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः”
…………………………………………….
©पल्लवी उमेश
जयसिंगपूर
२०/१०/२३

Author:

मी पल्लवी ...मला लिहिण्याची खुप आवड..पण मी स्वत:च्या आनंदासाठी लिहिते..कुणी छान म्हणावे , कुणाला आवडावे म्हणुन लिहिण्या पेक्षा मला किती आवडते, आवडले याचा विचार मी प्रथम करते.मी कथा, कविता..लेख इ. च्या माध्यमातुन आपल्या समोर येत आहे.मला सतत आनंदी राहायला आवडते...

Leave a comment