Posted in लेख

नवरात्र…आठवी माळ…

(८)
आठवी माळ……
मला भावलेलं स्त्रीत्व
नवदुर्गाच्या नऊ स्तोत्रांसहित…
नवदुर्गा मंत्र
प्रथमं शैलपुत्री च द्वितीयं ब्रह्मचारिणी
तृतीयं चन्द्रघंटेति कूष्माण्डेति चतुर्थकम्,
पंचमं स्क्न्दमातेति षष्ठं कात्यायनीति च
सप्तमं कालरात्रीति महागौरीति चाष्टमम्,
नवमं सिद्धिदात्री च नवदुर्गाः प्रकीर्तिताः।।
||अष्टम देवी महागौरी नमस्तुभ्यम ||

श्वेते वृषे समारूढा,श्वेताम्बरधरा शुचि:।
महागौरी शुभं दद्यात्, महादेवप्रमोददाद।।

अर्थ….. पांढऱ्या शुभ्र बैला वर पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून बसलेली अत्यंत पवित्र आणि भगवान महादेवाला आपल्या भक्तीने प्रसन्न करणारी देवी महागौरी आम्हां सर्वांचे कल्याण कर.

मध्यंतरी एका बारशाला जायचा योग आला होता. तुम्ही लवकर या असा आग्रह होता म्हणून मी थोडी लवकर गेले होते. पण तिथे पोहचल्यावर मला वाटले, मलाच उशीर झाला. मग मी आपली कुणी ओळखीचे दिसते का म्हणत इकडे तिकडे नजर टाकत होते. तेवढ्यात बाळाची आजी म्हणजे माझी मैत्रीण आली. मी म्हणले,
” का ग मला उशीर झाला वाटते…सगळ्या आल्या का मैत्रिणी? गर्दी ही खूप दिसतेय मला त्या दिसत नाहीयेत.”…

तशी ती म्हणाली, ” नाही..तूच पहिली आलीस….हा सगळा आमचा नातेवाईकांचा गोतावळा आहे. ये ओळख करून देते.” ….म्हणून छान कौतुकाने हसली.आणि प्रत्येकीची ओळख करून दिली…प्रथम मी खूप सुखावले ते गोतावळा हा शब्द ऐकल्यावरच.आणि नंतर इतक्या नातेवाइकांची ओळख करून दिली ,की काही विचारू नका.मी जेलस फील करू लागले मनात…किती नातेवाईक आहेत हिला..आणि नुसते नाहीत, तर बारश्या सारख्या कार्यक्रमाला सगळे हजर आहेत…खूप कौतुक वाटले.
आपल्या कडे मात्र एखादा कार्यक्रम काढा…येतील का सगळे इतके पाहुणे? ठराविक लोक येतात आणि जातात.
पूर्वी मात्र आपण सण साजरे करू तेंव्हा सर्व हजर असतं..आता कोरोना मुळे म्हणा किंवा काही कारणाने कमीत कमी लोकं बोलवायची जणू पद्धतच झालीय.
कोणताही सण,कार्यक्रम असो घरात स्त्रियांची नटून थटून चाललेली लगबग मात्र हवीच बुआ… अशावेळी सभोवार नजर टाकली की सगळी कडे स्त्री वर्गच उठून दिसतो. त्यांच्या शिवाय कार्यक्रम शून्य. याप्रसंगी त्यांच्या अंगात नवदुर्गाच अवतरत असते. त्यांच्या शिवाय सण हा सण वाटत नाही की उत्सव ही .
आज नवरात्री निमित्त मला आपल्या सर्वांच्या नात्यातील सर्व महिला आठवल्या; ज्या सर्व नवदुर्गा देवीची रूपेच आहेत. एका वेळी अनेक आघाड्यांवर या लढत असतात. एका वेळी अनेक कामे त्या लीलया पेलत असतात . त्यांच्या शिवाय घरात काहीच घडू शकत नाही. घरात बाई नसेल तर ते घर, घर रहात नाही….
१) आजी …..आज आपल्या घरात घराची मजबूत भिंत असलेली आजी हवी असते. ती संपूर्ण कुटुंबाचा कणा असते.तिच्या राज्यात तीच प्रमुख असते.तिची सत्ता जोवर , तो पर्यंत कुटुंब एकसंध असते. दुधावरची साय म्हणत माया करते ,म्हणून सर्व नातवंडे तिच्या सहवासात मजेत असतात…कणखरता हा नारी शक्तीचा गुण तिच्यात ठासून असतो.

२) आई.…आई तर आई असते…आपले घर ती उत्तम सजवते..आल्या गेल्यांच उत्तम स्वागत करते.सण समारंभात स्वत:ला पूर्ण झोकून देते.आई कधी दमत नाही…कारण विश्रांती ती कधी घेत नाही….आजची आई घरात कर्तव्यदक्ष तर असतेच, पण बाहेरच्या जबाबदाऱ्या ही ती आज उत्तम सांभाळते आहे. पूर्वी सारखे ती आज फक्त चूल आणि मूल मध्ये न रमता, आज ती बाहेर सामाजिक कार्य ही करते… समाजकारण,राजकारण, बिझनेस, उत्तम सांभाळते…..कर्तव्यदक्षता हा नारी शक्तीचा गुण तिच्यात मुरलेला असतो.

३). सासू….सासू म्हणजे घरातील जबरदस्त प्रकरण . पूर्वी सासूचा दबदबा असे..त्या म्हणतील तेच घरात होत असे. सासू असे पर्यंत कुटुंब एकमेकांना बांधून असे….आजचे चित्र वेगळे आहे. सासू सासूच असते पण पूर्वी इतकी कर्मठ नसते..आजच्या नवीन सुनांना सासू नावाची दहशत माहीतच नाहीय. ते एका दृष्टीने चांगलेच आहे म्हणा..आपली आजची सासुवाली पिढी खरीच समजूतदार आहे. मला माझ्या सासूने त्रास दिला, म्हणून मी माझ्या सुनेला त्रास देणार, या भंपक विचारातून कधीच बाहेर पडलीय…कारण ती खूप शिकलेली सासू आहे.बाहेरचे जग ही तिने पाहिले आहे. मार्गदर्शकता हा महत्वाचा स्त्री शक्तीचा गुण असतो या व्यक्तीत

४) काकू….काकू हा ही कुटुंबाचा महत्वाचा घटक आहे ..आई बरोबर स्वयंपाक घरात आढळणारी हमखास व्यक्ती. मी हे आताचे चित्र नाही बघत…आता स्वतंत्र राहणीमानाचा फंडा चालुय…ही गंमत या काळातील मुलांना दुर्देवाने नाही बघता येत.पण आम्ही खूप अनुभवले आहे. या काकू नामक व्यक्ती म्हणजे आईचेच प्रतिरूप असल्याने मला आई धरून सात आई होत्या म्हणावे लागेल..आज ही काकुच्या मांडीवर डोकं ठेवून मी पडू शकते…मोठ्या, लहान काकू सर्वांना ‘ए काकू’ म्हणतो आम्ही.. आई सारखेच. जावा जावा अशा बहिणी सारख्याच असाव्यात घरोघरी . तर घर हे घर राहते. एकमेकांना धरून राहते. ,पण या जावा आपापसात कधीच भांडत नसत. एकमेकींना धरून असतं सर्वजणी.. त्यांच्यातील एकसंधता हा नारी शक्तीतील महत्वाचा गुणधर्म आढळतो.

५) आत्या…..आत्या घरातील भाच्यांचा विक पॉइंट. ..घरातील सर्व गोष्टींची बितंबातमी या व्यक्तीकडे असायची. आत्या आमच्यावर आज ही खूप खूप प्रेम करते. आज ८० च्या जवळपास पोचली,थकली असली तरी अधून मधून फोनवर सर्वांची विचारपूस करणारी ही आत्या खूप भारी आहे. सर्वांची लाडकी…या व्यक्तीत लोकप्रियता हा नारी शक्तीचा महत्वाचा गुण आहे.

६) मावशी….मावशी हे एक असे रसायन आहे की आईचे प्रतिरुप जणू…मावशी घरी आली की आईला आणि तिला दोघींना काय करू आणि काय नको असे होई. बोलत बसायचे, की काम करायचे सुचत नसे…..करमाळा आमचे आजोळ…या चौघी जमल्या की आम्ही मुले लुडबुड करायचो त्यांच्यात.मावशी कधीच न रागावणारीच असते. भाच्चे कंपनीवर प्रचंड प्रेम करणारी ही व्यक्ती असते.. त्यांच्याशी मुलं होऊन मिसळते ती. मजा असायची आजोळी एकत्र आलो की….आता या पिढीत या गोष्टी दुर्मिळ दिसतात. पण एखादी मावशी तरी असावी प्रत्येकाला. आता कुटुंबच लहान होत चालली आहेत. निर्मळता हा स्री शक्तीचा गुण असतो तिच्यात.

७) सून ..सून म्हणून घरात लक्ष्मीच्या पाऊलांनी ही प्रवेश करते, त्यावेळी खरचं प्रसन्न आणि कृतकृत्य वाटावे.कारण पुढे आपल्या या संसार रथाचे सारथ्य ही जोडीच करणार असते. समजूतदार आणि संस्कारी मुलगी ही सून म्हणून आज प्रत्येक घराची गरज आहे. नवीन नवीन गोष्टी ही घरात करत असते.दुसऱ्या घरातून आलेली, हीच उद्याची आपली वंशवेल वाढवणारी नाजूक वेल असते. नावीन्यपूर्ण हा स्त्री शक्तीचा गुण हीच्यात दिसतो.

८) बहीण ..ज्यांना बहिण नाही ते खरोखर कमनशिबी म्हणते मी..भावाला बहीण,आणि बहिणीला ही एक बहीण असावी…एकमेकींच्या सहवासात वाढणाऱ्या बहिणी खूप नशीबवान असतात. मी या बाबतीत कमनशिबी आहे..आपल्या मनातले बोलायला आई नंतर बहीणच तर असते..आणि ज्या घरात जेंव्हा बहिणीचा वास असतो , त्या घरात रक्षाबंधन, भाऊबिज या सणांचे महत्त्व कैकपटीने वाढते..प्रत्येक बहिणीचे स्वागत माहेरी हसऱ्या चेहऱ्याने झाले, तर ती बहीण लाखमोलाचे सुख पदरी पाडून सुखाने सासरी जाते.बहीण ही खंबीर पणे आपल्या भावंडामागे उभी असते. आई वडिलां नंतर भावाने जमेल तसे तिचे माहेरपण जरूर करावे… प्रेम द्यावे घ्यावे . आजकाल नाती कमी होत आहेत,पण जी आहेत ती तरी आता प्रत्येकाने जपावित. बहीण हा आपला एक हळवा कोपरा प्रत्येकाने जपावा. आल्या प्रसंगाला खंबीरपणे तोंड देणारी बहीण असते. ही खंबीरता …हीच स्त्रीशक्ती.
९) मुलगी ..मुलीचा जन्म झाला की लक्ष्मी आली म्हणून स्वागत होते. भावाच्या पाठीवर आली तर कोण कौतुक असते…पहिली झाली तर, पहिली बेटी धनाची पेटी…म्हणून स्वागत असते..
आजकाल मुली मुलांपेक्षा सरस असतात..म्हणून दोन ही मुली झाल्या तरी खूप आनंद होतो..दोघी एकमेकींना भारी असतात.आणि दोघी मिळून जग जिंकतात. मी तर म्हणते मुली या मांजरा सारख्या पायात घुटमळत असतात…घरात सतत चिवचिवाट असतो, घराचे चैतन्य असतात मुली. घराला जाग असते एकप्रकारे. ज्या घरात मुलगा आणि मुलगी असतात त्यांना मी काय म्हणते ते लक्षात येइल….मुलीमुळे कन्यादाना चा पवित्र विधी हातून घडतो….प्रत्येक घरात एक तरी मुलगी असावीच…ती शक्ती असते जगायची, उभारी घेते मनाची..ताकद देते जीवन जगायची…
स्त्री शक्ती चे हे लक्ष्मी रूप असते.

या वर सांगितलेल्या सर्व नवदुर्गा प्रत्येकाच्या घरात असतात.त्यांचा सन्मान केला,आदर केला,तरी नारी शक्तीची पूजा केल्यासारखे आहे.
“यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः”
आज आपण हे व्रत घेऊयात ,की घरच्या स्त्री ला कुणीच दुखवता कामा नये..स्त्री ने स्त्रीचा सन्मान करावा..आपापसात मतभेद ठेवू नयेत..एवढेच या नवदुर्गा शक्ती रुपा निमित्ताने सांगते.

या देवी सर्वभूतेषु व्रती-रुपेण संस्थिता |नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥
……………………………………………..
©पल्लवी उमेश
जयसिंगपूर
२२/१०/२३









Author:

मी पल्लवी ...मला लिहिण्याची खुप आवड..पण मी स्वत:च्या आनंदासाठी लिहिते..कुणी छान म्हणावे , कुणाला आवडावे म्हणुन लिहिण्या पेक्षा मला किती आवडते, आवडले याचा विचार मी प्रथम करते.मी कथा, कविता..लेख इ. च्या माध्यमातुन आपल्या समोर येत आहे.मला सतत आनंदी राहायला आवडते...

Leave a comment